
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे प्रकल्पाचे काम २ वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन !
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे प्रकल्पाचे काम २ वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन !
धाराशिव जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने व महाराष्ट्राचे कुलदैवत रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी महत्त्वपूर्ण सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे प्रकल्प २ वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने नियोजन झाले आहे.
दिनांक १२/०५/२०२३ रोजी शासकीय विश्रामगृह, शिंगोली येथे झालेल्या आढावा बैठकीत रेल्वे, महसूल, सार्वजनिक बांधकाम व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची सद्यस्थिती बाबतची माहिती दिली. साधारण ४१८ हेक्टर जमिनीचे संपादन या रेल्वे मार्ग व स्थानकासाठी प्रस्तावित आहे.
भूसंपादनासाठी या जमिनीचा निवाडा करण्याची प्रक्रिया महसूल यंत्रणाच्या माध्यमातून २ महिन्याच्या आत पूर्ण करायचे ठरले आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक आठवड्याला कामाचा आढावा घेण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. ९०% भूसंपादन झाले की प्रकल्पाची निविदा काढण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
दिनांक ०५/१२/२०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ४ वर्षांची कालमर्यादा असणारा हा प्रकल्प २ वर्षात पूर्णत्वास नेण्यासाठी कामाचे भाग करून स्वतंत्र निविदा काढण्याचा सूचना आपण दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने कामाचे ३ भाग करण्यात आले आहेत. धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येकी १ भाग व बोगदाच्या कामाचा ३ रा भाग करण्यात आला असून निवेदेमध्ये काम २ वर्षात पूर्ण करण्याची अट प्राधान्याने ठेवण्यात येणार आहे. या महत्वकांशी प्रकल्पाचा आढावा दर महिन्याला घेऊन नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी आपला पाठपुरावा असणार आहे.
याप्रसंगी मध्य रेल्वे सोलापूरचे सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री.राजनारायण भगवानदीप, सोलापूर येथील वरिष्ठ स्तर अभियंता नुरूस्सलान, उपअधीक्षक भूमि अभिलेख तुळजापूर श्री.एस.आर.साकतकर, वनरक्षक श्री.व्ही.एस.पाटील, महसूल, भूमी अभिलेख, रेल्वे व वन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.