
पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना त्या महसूल मंडळातील नुकसानीच्या सरासरी प्रमाणे विमा मिळणार !
पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना त्या महसूल मंडळातील नुकसानीच्या सरासरी प्रमाणे विमा मिळणार !
खरीप २०२२ मधील पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना त्या महसूल मंडळात दिलेल्या नुकसानीची सरासरी काढून त्याप्रमाणे विमा देण्याचे विमा कंपनीने मान्य केले आहे. केंद्र सरकार कडील हप्त्याची रक्कम उपलब्ध होताच या शेतकऱ्यांना विमा वितरीत करण्यात येणार आहे.
खरीप २०२२ मधील पीकांच्या नुकसानीपोटी धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकरी अजूनही पीक विम्यापासुन वंचित असून पंचनाम्याच्या प्रती अद्याप उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नाहीत. तसेच नुकसान भरपाईमध्ये केलेली ५०% नियमबाह्य कपात व पंचनामे न केलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई बाबत विमा कंपनीकडुन कार्यवाही होत नसल्यामुळे दि.२८/०२/ २०२३ रोजी आपण भारतीय कृषी विमा कंपनी कार्यालय, मुंबई येथे भेट देऊन विभागीय व्यवस्थापक श्रीमती शकुंतला शेट्टी यांच्या सोबत चर्चा केली.
जिल्ह्यातील ५,८९,२२६ शेतकऱ्यांनी नुकसानीच्या अधिसूचना विमा कंपनीकडे केल्या होत्या. मात्र यातील १ लाख ३४ हजार सूचना विमा कंपनीने नियमबाह्यरित्या नाकारल्या आहेत. तर अनेक शेतकऱ्यांना अत्यल्प पीक विमा मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांचे तर पंचनामेच करण्यात आले नाहीत.
ही बाब अत्यंत गंभीर असून पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना अनुज्ञेय नुकसान भरपाई वितरित करण्यासह पंचनाम्याच्या प्रती लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची तसेच चुकीचे निकष लावून नुकसानीच्या टक्केवारीत केलेली ५०% ची कपात रद्द करून प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीप्रमाणे सुधारित नुकसान भरपाई वितरीत करण्याची सूचना विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली आहे.
भारतीय कृषी विमा कंपनीच्या विभागीय व्यवस्थापक श्रीमती शकुंतला शेट्टी यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिलेल्या ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत, अशा शेतकऱ्यांना त्या महसूल मंडळात दिलेल्या नुकसानीची सरासरी काढून त्याप्रमाणे विमा देण्याचे मान्य केले असून पंचनामे जमा करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले आहे.
तसेच केंद्र सरकारकडील हप्त्याची रक्कम प्राप्त होताच पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा वितरीत करण्याचे मान्य केले आहे. दि.०१ ऑक्टोबर पासून जिल्ह्यात पीक कापणी प्रयोग सुरु झाल्याचे कारण देत नुकसानीच्या टक्केवारीत ५०% भारांकण लावून निश्चित केलेल्या नुकसान भरपाई बाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. सर्व शेतकऱ्यांना हक्काची नुकसान भरपाई मिळेपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहणार आहे.
#पिक #शेती #शेतकरी #मदत #धाराशिव #farming #farmers #help #dharashiv