
नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना !
नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना !
जुलै-२०२२ अखेर झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव श्री.संजय धारूरकर यांच्याशी केलेल्या चर्चेच्या अनुषंगाने नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
सोयाबीन पेरणी झाल्यापासून आजपर्यंत अनियमित व विलंबाने झालेला पाऊस, गोगलगाईंचा प्रादुर्भाव, फेर पेरणी अशा विविध नैसर्गिक संकटांना शेतकरी बांधव सामोरे जात आहेत. त्यातच जुलै महिन्याच्या शेवटी जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे, शेत जमिनींचे अभूतपूर्व असे नुकसान झाले आहे.
कोंड, नितळी, जागजी, सुंभा, येवती, येडशी व एरंडगाव येथील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी अनेक शेतात पाणी साचलेले व पिकांचे पूर्णपणे नुकसान झालेले दिसून आले. जिल्ह्यातील इतर काही भागात देखील मुसळधार पाऊस पडल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आले. या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग चिंतातुर आहे.
झालेल्या पावसाबाबत अधिक माहिती घेतली असता असे निदर्शनास आले की, मुसळधार पाऊस पडलेल्या अनेक ठिकाणच्या पर्जन्य मापकामध्ये ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त पर्जन्याची नोंद झाली नसल्याने केंद्र / राज्य आपत्ती निवारण निकषाप्रमाणे मदत मिळणे शक्य नाही. या अनुषंगाने मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव श्री.संजय धारूरकर यांच्याशी चर्चा केली असून झालेल्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठविण्याचे ठरले आहे. पर्जन्य मापकावर जरी ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस दिसत नसला तरी प्रत्यक्षात मात्र पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असून नुकसानही त्याच प्रमाणात झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
त्यामुळे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची व्याप्ती लक्षात घेता, मदत व पुनर्वसन विभागाच्या उपसचिवांशी चर्चा करून तातडीने स्वतंत्र वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.