skip to Main Content
300 ग्रंथगाळ्यांची उभारणी..!!

300 ग्रंथगाळ्यांची उभारणी..!!

यंदाच्या साहित्य संमेलनात वाचनप्रेमी रसिकांसाठी मोठी पर्वणी : 300 ग्रंथगाळ्यांची उभारणी..!!

“आयोजनातील वेगळेपणामुळे उस्मानाबाद येथे होत असलेले ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नक्की लक्षवेधी ठरेल, असा विश्वास मला आहे… यानिमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्यातील एकुण वैभवशाली इतिहासाला झळाळी मिळणार आहे. देशभरातून साहित्य संमेलनासाठी येणार्‍या मान्यवरांना तेर आणि परिसरातील प्राचीन इतिहासाचे दर्शन व्हावे याकरिता तगर हेरिटेज वॉक देखील संमेलन काळात आयोजित करण्याबाबत तेर ग्रामपंचायत आणि पुरातत्त्व विभागाला सूचना देखील दिल्या आहेत..!”

उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यानिमित्ताने सुसज्ज ग्रंथदालन उभारणीस शनिवारी मोठ्या उत्साहाने सुरुवात करण्यात आली. या संमेलनात वाचनप्रेमी रसिकांसाठी मोठी पर्वणी राहणार आहे. आधुनिक साधनांचा वापर करुन ३०० ग्रंथगाळे निर्माण करण्याच्या कामाचा शुुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नीतीन काळे, ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशीव, स्वागताध्यक्ष नीतीन तावडे, कार्यवाह रवींद्र केसकर, कोषाध्यक्ष माधव इंगळे, सहकार्यवाह प्रशांत पाटील, सतीश दंडनाईक, नगरसेवक युवराज नळे, कार्यकारिणी सदस्य अग्निवेश शिंदे, राजेंद्र अत्रे,बालाजी तांबे, इलियास पीरजादे, मीना महामुनी, कमल नलावडे यांच्यासह साहित्य संमेलन संयोजन समितीचे पदाधिकारी, सदस्य व साहित्यप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ग्रंथप्रेमींसाठी सुसज्ज असे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रतिभावान साहित्यिकांचे ग्रंथ, कादंबरी, आत्मचरित्र, कथा, कवितासंग्रह असे अनेकविध साहित्यप्रकार या ग्रंथप्रदर्शनात वाचकांच्या भेटीला येत आहेत. १० फूट बाय १२ फूट आकाराचे सुसज्ज ग्रंथगाळे तयार केले जात आहेत. या कामाचा शुभारंभ श्री तुळजाभवानी देवी आणि संत गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे विधिवत पूूजन करुन करण्यात आला.

शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर हे ग्रंथदालन साकारले जात आहे. सुमारे दोन एकर क्षेत्रावर हे ग्रंथदालन उभारले जात आहे. ८० बाय २०० फूट आकाराचे ३ मोठे मंडप उभारले जाणार आहेत. त्या मंडपात पुस्तक विक्रेते तसेच खरेदीसाठी येणार्‍या रसिकांसाठी विविध सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत. ग्रंथ विक्रेत्यांसाठी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था, दोन टेबल, दोन खुर्च्या, एक चार्जिंग पॉइन्ट पुरविला जाणार आहे. एका संस्थेला अथवा विक्रेत्याला एका ठिकाणी केवळ चार गाळ्यांची नोंदणी करता येणार आहे. प्रतिगाळा दोन व्यक्तींचे भोजन आणि निवासाची व्यवस्था संयोजन समितीतर्फे करण्यात आली आहे. त्याकरिता ग्रंथगाळ्यांचे भाडे व इतर सोयीसुविधांपोटी प्रतिगाळा ६५०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

 

 

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.